…मानवी स्वभाव आणि मानवी क्रिया यांच्या मुळाशी मनाचं स्वातंत्र्य हा एक महत्त्वाचा घटक असतो, असं अलीकडच्या काळातील मानसशास्त्रज्ञ मानतात; परंतु आधुनिक जगात जगण्याच्या प्रक्रियेत हे स्वातंत्र्य अबाधित राखणं आणि जोपासणं अतिशय अवघड असतं. सगळेच लोक ते साधू शकत नाहीत. उलट स्वातंत्र्याला अव्हेरून त्यापासून सुटका करून घेण्याकडे बहुतेकांचा कल असतो. अशी माणसं स्वतःचं व्यक्तिवैशिष्ट्य कायम राखू शकत नाहीत. बंदिस्त मनानं ती एक तर समाजातल्या अधिकारशहांसमोर गुडघे टेकवून, त्यांचं आधिपत्य मान्य करून, मांडलिकत्वाच्या भावनेत समाधान मानून जगत राहतात, किंवा मग स्वतःच इतरांवर आधिपत्य गाजवू पाहतात. आपल्या समाजात या आधुनिक काळातही प्रबळ होत जाणाऱ्या धार्मिक अहंकार, सांप्रदायिकता, मूलतत्त्ववादी वृत्ती, मिथ्या विज्ञान आणि स्वार्थमूलक नीतिमत्ता या गोष्टींना नेमकी हीच वृत्ती कारणीभूत आहे, मात्र समाजात काही व्यक्ती मनाचं हे स्वातंत्र्य निष्ठापूर्वक जोपासणाऱ्या असतात. अशी माणसं संख्येनं कमी असली तरी व्यक्तिगत पातळीवर त्यांच्या विचार, भावना, विवेकबुद्धी, तारतम्य आणि जबाबदारीची जाणीव या गोष्टींचा विकास होऊन ती सकारात्मक कृती करू शकत असतात. अशाच वेगळ्या वाटांचे हे काही प्रवासी !… |