‘वारूळ’ ही बाबाराव मुसळे यांची कादंबरी ग्रामीण भागातील मागासवर्गीयांच्या समाजजीवनाचं यथार्थ दर्शन घडवते. दोन भागांत असलेल्या या कादंबरीमध्ये मागास जातींतील तीन पिढ्यांचे (विशेषत: दोन पिढ्यांचे) दैनंदिन जीवन, त्यांच्याच पोटजातीत असलेले कौटुंबिक हेवेदावे, मतभेद, पारंपरिक चालीरिती, त्यांची गरिबी, शिक्षणाचा अभाव यामुळे त्यांच्या एवूÂण सामाजिक जीवनावर होणारे दूरगामी परिणाम यांवर लेखकाने विशेष भर दिला आहे. तसेच यामध्ये १९७०-७१चा दुष्काळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मागासवर्गीयांसाठी केलेल्या कार्याची ओळख, मातंगांसाठीची चळवळ, संभाव्य धरणामुळे त्या परिसरावर अवलंबून असणाऱ्या लोकांवर ओढवू पाहाणारे संकट, निवडणुका, जाती-उपजातींतील (सवर्ण-मागास आणि कुणबी-महार, मांग वगैरे) गुंतागुंतीचे, शह-काटशहाचे स्थानिक राजकारण; त्यामुळे एकमेकांवर केली जाणारी कुरघोडी हे सारे टप्प्याटप्प्याने, ओघाओघाने गुंफले आहे. या सर्वांवर आधारित विविध घटना-प्रसंगांमुळे वाचकाला मागासवर्गीयांच्या समाजजीवनाचे यथार्थ दर्शन होते.