गोपाळ गणेश आगरकरांच्या विचारांचा व एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील एकमेव बुद्धिप्रामाण्यवादी समाजसुधारक म्हणून त्यांच्या भूमिकेचा विस्तृत अभ्यास झाला नव्हता. अरविंद गणाचारी यांनी ही उणीव यशस्वीरीत्या भरून काढली आहे. आगरकरांचा काळ व त्यांचे कर्तृत्व यांचे वर्णन करताना छापील दुय्यम साधनांच्या वापराबरोबरच, डॉ. गणाचारींनी खाजगी कागदपत्रे, तत्कालीन मुंबई सरकारच्या आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीची कागदपत्रे यांमधून यापूर्वी प्रकाशित न झालेली अस्सल साधने शोधून काढली आहेत.
तत्कालीन समाजसुधारकांपेक्षा वेगळे असलेले आगरकर नेमस्त राजकीय सुधारणांच्या बाजूचे नव्हते. भारतातील ब्रिटिश सत्तेवर त्यांनी कठोरपणे टीका केली आणि स्वराज्याच्या मागणीचा पुरस्कार केला. त्यांची बौद्धिक प्रामाणिकता, नैतिक कळकळ आणि आचार-विचारांतील संपूर्ण एकरूपता या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या काळातील समाजसुधारकांमध्ये आगरकर अग्रगण्य होते. आपली विरोधी मते निर्भीडपणे मांडणाऱ्या आणि आपल्या समकालीन लोकांना तशाप्रकारे चर्चा व युक्तिवाद करायला शिकवणाऱ्या गोपाळ गणेश आगरकरांसारख्या एका एकाकी बुद्धिप्रामाण्यवाद्याची स्मृती जागी ठेवणे आवश्यक ठरते.
Thanks for subscribing!
This email has been registered!