वैज्ञानिक प्रयोग माणसाला प्रगतिपथावर नेतात; पण या प्रयोगांमध्ये काही त्रुटी राहिल्या, चूक झाली किंवा त्या प्रयोगाचा कुणी गैरवापर केला तर किती गंभीर समस्या उद्भवू शकतात आणि माणसाच्या भावविश्वाला त्यामुळे कसा सुरुंग लागतो, याचं प्रभावी चित्रण करणाऱ्या कथांचा संग्रह आहे ‘इ.स.२५९५.’ यातील ‘जिवंत मशीन’ या कथेतील प्रो. समीर, रीबी नावाचा स्त्री रोबोट बनवतात; पण रीबीकडून सरिताचा खून होतो...‘विचित्र नाती’ कथेतील विनय आणि मनोरमा हे दाम्पत्य परस्परांवर प्रेम करणारं...पण मनोरमाला जीवघेणा अपघात होतो आणि ती मरणाच्या दारात पोचते...विनय तिला क्लोनिंगद्वारे जिवंत ठेवू पाहतो...पण त्यामुळे कशी गुंतागुंत होते? ‘आणि एक स्वप्न विरले’ या कथेत परस्परांना ओळखत नसलेल्या चार व्यक्ती काही कारण नसताना आत्महत्या करतात...पण पोलीस तपासात आत्महत्यांमागचं वैज्ञानिक सत्य उलगडतं...काय असतं ते सत्य?...वैज्ञानिक प्रयोगांतून उद्भवलेल्या गंभीर समस्यांचं भेदक आणि उत्कंठावर्धक चित्रण करणाऱ्या कथा.