स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अस्पृश्यताविरोधी भूमिकेचा अभ्यास करताना धनंजय कीर यांचे लक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘उद्धरेत आत्मनाम् आत्मानम्’ हया ध्येयाकडे गेले आणि त्यांनी आंबेडकर चरित्रासाठी साधने जमवण्यास सुरुवात केली. त्यांचे लेखन पूर्ण होत आले तोवर बाबासाहेब आजारी होते. तरीही कीरांना आपल्या मनातील अनेक शंकांचा खुलासा करून घेता आला. अशा रीतीने सावरकर आणि आंबेडकर चरित्रांसाठी त्यांनी दस्ताऐवज, त्यांचे समकालीन सहकारी यांचा आधार जसा घेतला त्याचप्रमाणे प्रत्यक्ष चरित्र नायकांचीही पसंती मिळवली.
दरवर्षी विक्रीचा उच्चांक गाठणार्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या चरित्र ग्रंथाची दखल घेतल्याशिवाय अभ्यासकांचा अभ्यास पूर्ण होत नाही. यामध्ये सनावळया आणि संदर्भग्रंथांच्या उल्लेखाने निवेदन जड होणार नाही याची कीर यांनी काळजी घेतली आहे. बाबासाहेबांच्या लेखनाची सूची, बाबासाहेबांवर झालेल्या लेखनाची सूची, यासोबत आंबेडकरांचा संक्षिप्त जीवनपट या पुस्तकात समाविष्ट आहे त्यामुळे अत्यंत माहितीपूर्ण व चरित्रात्मक राजकीय साहित्यामध्ये मोलाची भर घालणारा हा नवीन रूपातील ग्रंथ आंबेडकरांच्या अनुयायांना, अभ्यासकांना आणि सर्वसामान्य वाचकाला आवडेल असा आहे.
Thanks for subscribing!
This email has been registered!