जाते-पाटे व दगडी मूर्ती घडवून जत्रांमध्ये विकणार्या पाथरवट कुटुंबातील उमा हा या कादंबरीचा नायक. व्यवस्थेच्या विरोधात तो संघर्ष करतो आणि पुढे त्याला अनेक वेळा अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागतं.
उमानं काढलेली दगड कामगार व मूर्तिकला सहकारी संस्था, शेतमालाच्या भावासाठी केलेली आंदोलनं, स्टोन क्रशर, डेअरी, रस्तेबांधणी यामुळे ठेकेदार, जातपंचायत व राजकारणी यांच्याकडून निर्माण झालेल्या व्यक्त-अव्यक्त विरोधाला उमा तोंड देतो.
कथानायक उमा, त्याची पत्नी अंजली, प्रा. निखाडे,
अशोक कांबळे या मुख्य व्यक्तिरेखांबरोबरच भास्करराव, वाल्मिकराव हे नेते, कोंडू-रुक्मी यांचे व्यक्तिचित्ररेखाटन चित्रदर्शी झालेले आहे. नव्यानेच घडविलेल्या म्हणी व उक्ती, वर्हाडी आणि पाथरवटी बोलींचं मिश्रण आणि भाषेचा केलेला सर्जक वापर यांमुळे कथेची वाङ्मयीन यत्ता वाढली आहे.
प्रतिनायकप्रधान कादंबर्यांनंतर रमेश अंधारे यांची ही नायकप्रधान कादंबरी महत्त्वाची ठरेल. या कादंबरीतील पाथरवट समाजाचे सूक्ष्म तपशिलांसह आलेले चित्रणही लक्षणीय आहे. जातींमधलं वैमनस्य, जातपंचायतीची सत्ता यांसह समकालीन समाजवास्तवाचं भेदक चित्रण ही या कादंबरीची जमेची बाजू आहे.
Thanks for subscribing!
This email has been registered!