श्रीशिवछत्रपतींनी स्वराज्यनिर्मिती केली तेव्हा मुघल साम्राज्य श्रीमंतीच्या आणि सामर्थ्याच्या अत्युच्च टोकावर जाऊन पोहोचले होते. जगातील सर्वात बलाढ्य साम्राज्य असा मुघल साम्राज्याचा दबदबा निर्माण झाला होता. श्रीशिवछत्रपतींनी आणि त्यांच्या अनुयायांनी सामर्थ्याच्या परमोच्च बिंदूवर विराजमान असलेले हे साम्राज्य मोडीत काढले. पुढे अठराव्या शतकात शिवशाहीच्या पाईकांनी स्वराज्याचे अटक ते कटक, कुमाऊँ ते कावेरी अशा साम्राज्यात रूपांतर केले. ज्या बलाढ्य मुघलांना मराठ्यांनी जिंकले त्या अजिंक्य मराठ्यांना एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस इंग्रजांनी नमविले. मध्ययुगीन भारतवर्षाचा हा इतिहास अभ्यासण्याची मोठीच आवश्यकता होती. प्रस्तुत अभ्यास • राष्ट्राला मार्गदर्शन करून आत्मविश्वास प्रदान करणारा आहे. डॉ. केदार फाळके यांनी ही आवश्यकता ओळखून शिवशाहीच्या साधार इतिहासाची मांडणी केली आहे.
'शिवछत्रपतींचा वारसा: स्वराज्य ते साम्राज्य' या ग्रंथात अस्सल साधनांवर आधारित असलेला यथातथ्य इतिहास आहे. केदार फाळके यांनी दोनशे वर्षांच्या विशाल आणि प्रवाही कालखंडाच्या प्रमाणसिद्ध इतिहासाचे लेखन केले आहे. ओघवती शैली, यथायुक्त साहित्यिक मूल्ये, कागदपत्रांची अचूक छाननी आणि तटस्थता या शुद्ध इतिहासाच्या गुणवैशिष्ट्यांमुळे, एखाद्या गालिच्यावर सायंकालीन संधिप्रकाशाच्या रमणीय छटा उमटाव्यात तसा हा ग्रंथ मनोवेधक झाला आहे. श्री शिवाजी मेमोरियल कमिटी, श्रीशैलम यांनी प्रकाशित केलेला हा ग्रंथ म्हणजे भारतीय इतिहास-कथनामध्ये अजोड योगदान ठरेल.
📔📓📔📓📔📓📔📓📔📓📔📓📔📓📔📓
Thanks for subscribing!
This email has been registered!