चहूकडे विकासकामांचा धडाका सुरू झाला. अमक्या गावाने शाळा बांधली, तमक्या गावाने रस्ता करून घेतला, तर फलाण्या गावाने धरण उठविले. अन् मग हिवर्याच्या बेलवण नदीवर पूल बांधायची कल्पना अण्णा वाण्यानं काढली. पूल नाही, पण फरशी बांधण्याकडे गावाचा कल झुकू लागला... घरटी किती वर्गणी– याचा खल झाला. ...अन् भीमा वस्तादानं एकाएकी आवाज टाकला– ‘‘पूल टाकायचं काम जो करंन, त्येचं कल्यान व्हनार न्हाई!’’ झालं... हिवर्याच्या बेलवणचं घोडं अडलं. सगळ्यांच्या फायद्याचं अन् सोय होण्याचं हे काम– मग भीम्या अन् त्याच्या बरोबरच्या पोरांना ते होऊ नये, असं का वाटत होतं? बरं, नको तर नको... पण या पुलाचं काम न होण्यानं विरोध करणाऱ्या भीमाचा तरी त्यापुढं किती फायदा झाला, की... झालं आयुष्याचंच नुकसान? विकासकामांना आडव्या टाळक्याची अन् स्वार्थी मनोवृत्ती कशी खोडा घालते, याचं हुबेहूब चित्रण...बेलवण