मराठीतील एक श्रेष्ठ कादंबरीकार म्हणून श्री. ना. पेंडसे परिचित आहेत. कोकणचा निसर्गसमृद्ध प्रदेश त्यांनी आपल्या लेखनातून प्रभावीपणे चित्रित केला आहे. कथा, कादंबरी, नाटक, आत्मचरित्र ह्या विविध वाङ्मयप्रकारांत त्यांनी चौफेर आणि सशक्त लेखन केले आहे. कोकणातील माणसं, वेगवेगळी ठिकाणं आणि संपन्न समुद्रकिनारा ह्याचं सर्जन म्हणजे पेंडसे यांचे एकूण लेखन आहे.
घटना-प्रसंग, निवेदन, संवाद, सहज भाषाशैलीत जीवनानुभव त्यांच्या लेखनात सहजपणे येऊन जातो. रंजनात्मकतेच्या पलीकडे जाऊन स्वतःला जाणवलेली अनुभवसृष्टी ते आपल्या लेखनातून उभी करतात. जीवनातील नाट्य रेखाटताना निवेदनात तटस्थ तरीही जीवनवेधी अशा चैतन्ययुक्त, जिवंत निवेदनातून जीवनाचे नाट्यमय दर्शन घडवतात.
श्री. ना. पेंडसे यांनी काही स्फुट लेखनही केले आहे. ‘अज्ञाताचा शोध’ हे त्यापैकी एक आहे. यातून ते आपल्या जीवननिष्ठांचा आणि जीवनातील घटनांचा ललित लेखनातून अन्वयार्थ लावतात. त्यात त्यांची चिंतनशीलता लक्षात येते.
बालकवी, गोविंदाग्रज आणि मर्ढेकर यांच्यानंतर खानोलकरांचं साहित्यातील स्थान, परदेशात गेल्यानंतर भारतीय माणसाची वागण्याची रीत व येणाऱ्या अडचणी, कादंबरी लेखनकलेविषयी केलेलं भाष्य, तुंबाडचे खोत ही दीर्घ आणि द्विखंडात्मक कादंबरी कशी लिहिली गेली याचा लेखाजोखा, सामाजिक बांधिलकी आणि लेखक यातील समन्वय इत्यादींचा वेध ‘अज्ञाताचा शोध’ यातील निवडक लेखातून घेतला आहे.