माणसातल्या माणुसकीचं दर्शन घडवणारी साने गुरूजींची सात्विक कथा. "... आजचा परम मंगल दिवस. उपनिषदं आज कृतार्थ झाली. परमेश्वरानं फार मोठी कृपा करून हा दिवस दाखवला. या भारताच्या इतिहासाचं विधिलिखित आज आपण लिहून ठेवीत आहोत. निरनिराळ्या जातींनी सुडबुद्धीनं एकमेकांशी सदैव लढत राहण्याऐवजी "आपलीच संस्कृती श्रेष्ठ, आपणच काय ते देवाचे लाडके, सर्व सदगुण केवळ आपल्यांतच आहेत, बाकीचे मानववंश म्हणजे नुसते शुंभ, हीन, असंस्कृत पशू...` असं मानण्याऐवजी, दुसर्या मानववंशांत दिव्यता आहे, त्या त्या भिन्न मानवी समाजांतही एक प्रकारची चारित्र्याची प्रभा असते, त्यांच्या त्यांच्या संस्कृतीतही विशिष्ट असे महत्त्वाचे गुण असतात, हे ध्यानात घेऊन एकमेकांशी एकमेकांच्या जवळ येणं, मनानं व बुद्धीनं अधिक श्रीमंत होणं, अधिक विशाल होणं हे सर्व मानवांचं कर्तव्य आहे, ही गोष्ट या भारतात आज प्रामुख्यानं ओळखली जात आहे. "अत:पर झालं गेलं विसरून गेलं पाहिजे. खंडीभर मातीतून जो एक सोन्याचा कण मिळतो, तो आपण जवळ घेतो. त्याप्रमाणे मानवी इतिहासाच्या अनंत घडामोडींतून शेवटी जो सत्कण मिळतो, तो घेऊन पुढं गेलं पाहिजे. ती आपली पुढची शिदोरी. "भावी पिढीच्या हातात द्वेषाची जुनी मशाल आपण देणार नाही. प्रेमाचा हा दीप त्यांच्या हाती देऊ. "हा नंदादीप वाढवीत न्या` असं त्यांना सांगू. जो सोन्याचा कण आपल्याला मिळाला, तो त्यांना देऊ...